News

निरामय स्वास्थ्याच्या संकल्पनेने आयुर्वेदाची उपयुक्तता समाजात कायम – सरसंघचालक डॉ.मोहन भागवत


आयुर्वेद व्यासपीठाच्या चरक भवन नूतन केंद्रीय कार्यालयाचे लोकार्पण

नाशिक दि. १४ जुलै – निरामय सुखी स्वास्थ्याची संकल्पना फार पूर्वीपासून आयुर्वेदानं मांडली आहे. त्यामुळे आयुर्वेदाची उपचारपध्दती ही वैश्विक ठरू लागली असून केवळ इलनेस (Illness ) नव्हे तर सर्वांसाठी वेलनेस (wellness) चा उपचार म्हणून या पॅथीकडे सर्वजण पाहू लागले आहेत. विशेषतः कोरोनाकाळात सर्वांनाच आयुर्वेदाचे महत्त्व पटले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. आयुर्वेदाने इतर पॅथींनाही जोडण्याचे काम करावे, त्यासाठी आयुर्वेद व्यासपीठसारखे संघटन उपयुक्त ठरेल,असेही ते म्हणाले.

सेवा ,संशोधन ,प्रचार व शिक्षण या चतुःसूत्रीद्वारे आयुर्वेद क्षेत्रात कार्य करणाऱ्या आयुर्वेद व्यासपीठ या सार्वजनिक विश्वस्त न्यासाच्या कार्यकर्त्यांच्या देणगीतून उभारलेल्या वास्तूचे आज शंकराचार्य न्यास येथे डॉ.भागवत यांनी आभासी पध्दतीने लोकार्पण केले. आयुर्वेद व्यासपीठाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय उपाध्यक्ष वैद्य जयंतराव देवपुजारी अध्यक्षस्थानी होते. वैद्य विनय वेलणकर ,वैद्य संतोष नेवपूरकर ,वैद्य रजनी गोखले व्यासपीठावर उपस्थित होते.

एकमेकांच्या संघटनाच्या माध्यमातून भवन उभारल्याबद्दल डॉ.भागवत यांनी आयुर्वेद व्यासपीठाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, जीवनात संघटन महत्त्वाचे असते, कोरानाकाळात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या काढा व अन्य उपचार पध्दतीच्या रूपाने आयुर्वेदाचे महत्व सर्वसामान्य माणसाला समजले आणि तो प्राचीन असलेल्या हजारो वर्षांच्या उपचारपध्दतीकडे वळाला ही चांगली बाब आहे. प्राचीन काळात भवन ही संकल्पना नव्हती तर वन होते आणि या वनामधील वनस्पतीच्या माध्यमातून उपचार केले जात आणि तितकेच ते प्रभावी असत.

उपचार पध्दतीचे आदान प्रदान व्हावे.
ते म्हणाले, आपल्याकडे अॅलोपॅथीद्वारे लवकर उपचार होतो त्या तुलनेत आयुर्वेद उपचारपध्दतीत बरे व्हायला खूप वेळ लागतो, अशी लोकांची धारणा आहे आणि त्यात गैर काही नाही. एखाद्या उपचार पध्दतीतील उपचार हे कशापध्दतीने केले जातात आणि ते किती मात्रा, उपायांवर होतात,यावर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ठरते. आजच्या युगात लोक हुशार झाले आहे. ते प्रत्येक पॅथीचा अनुभव घेऊ लागले आहेत. त्यामुळे भारतीय प्राचीन असलेल्या आयुर्वेदातील अभ्यासकांनी देखील इतर पॅथींचे ज्ञान प्राप्त करावे तसेच अॅलोपॅथीसह इतरही पॅथीच्या लोकांनी आयुर्वेदाचे ज्ञान आत्मसात करण्यास काय हरकत आहे. उपचारपध्दतीचे आदान प्रदान व्हायला हवे असे वाटते.

गुणवत्ता अन् दर्जा सर्वात महत्वाचा
उपचार पद्धतीत दोन तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यात त्या पॅथीची गुणवत्ता अन् दर्जा काय आहे, यावर सारे काही अवलंबून असते. याशिवाय स्वस्त,सुलभ आणि सहजपणे उपचार तोही रूग्ण पूर्ण बरा कसा होईल,असा व्हायला हवा. आयुर्वेदाचा विचार केला तर प्राथमिक चिकित्सा व दुसऱ्या उपचार पध्दतीत होणारा खर्च यात फरक दिसतो. उशिरा का होईना आयुर्वेदाची मात्रा गुणकारी ठरते, आयुर्वेदातील काही उपचार हे तातडीने बरे होण्यास मदतीचे ठरतात , हेही आपल्याला नाकारता येणार नाही. असेही ते म्हणाले.

व्रतस्थपणे प्रयत्न व्हायला हवे.
चिकित्सा सहज,सुलभ होण्यासाठी आयुर्वेदाचे सर्वाधिक महत्त्व कोरोना काळात लोकांना पटले आहे, भारतातील १३० कोटी लोकांपर्यत ही उपचारपध्दती पोहोचण्याची आज गरज आहे, त्यासाठी आपल्याला व्रतस्थपणे प्रयत्न करायला पहिजे, केवळ आजारी रूग्ण बरे करणे नव्हे तर तो कायम निरामय आणि आहारविहाराच्या बाबतीत स्वस्थ राहिल, याबाबत विचार करायला हवा, त्यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ आयुर्वेद व्यासपीठाला हाती घ्यावे लागेल. आयुर्वेद हे वर्षानुवर्षे चालणारे शास्त्र आहे. त्यासाठी वैश्विक प्रचारासाठी प्रशिक्षक,विद्यार्थी,तज्ज्ञ ,वैद्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. काहीवेळी आपल्या शास्त्राला चूकीच्या असत्य,अंधश्रध्दांसारख्या बाबींचा सामनाही करावा लागतो, पण त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. असेही भागवत यांनी सांगितले.

यावेळी देवपूजारी यांची दिल्लीच्या राष्ट्रीय आयोग भारतीय चिकित्सा पद्धतीचे प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आयुर्वेद व्यासपीठातर्फे सरसंघचालकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रजनी गोखले यांनी प्रास्ताविक केले. सतोष नेवपूरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विलास जाधव यांनी आभार मानले, मंदार भणगे यांनी वैद्यगीत सादर केले. यावेळी आयुर्वेद व्यासपीठाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा तसेच कोविड महामारीत विशेष कार्य केलेल्या वैद्यांचा, वास्तुनिर्माते पोद्दार आशुतोष गुप्ता, रणजित पुराणिक आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी वैद्य शिरीषकुमार पेंडसे ,वैद्य विलास जाधव वैद्य मल्हार जोशी, वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य राजेश गुरु ,वैद्य आशुतोष यार्दी ,कमलेश महाजन ,सौरभ जोशी आदि उपस्थित होते.

Back to top button