![](https://vskmum.s3.ap-south-1.amazonaws.com/wp-content/uploads/2021/02/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE.jpg)
श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी समाजाच्या सर्व स्तरातील आबालवृद्ध रामभक्तांनी यथाशक्ती योगदान दिले. सूरतच्या ११ वर्षांच्या भाविकाने तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी राममंदिरासाठी समर्पित केला. भाविका प्रभू श्रीरामांवर आख्यान सादर करते. आजवर चार ठिकाणी झालेल्या आख्यानांच्या वेळी जमा झालेले सगळे पैसे राम मंदिर निधी कोशात जमा केले.
लॉकडाऊनच्या काळात केला भगवदगीतेचा अभ्यास
सहावीत शिकणाऱ्या भाविकाने लॉकडाऊनच्या काळातच राममंदिरासाठी पैसे जमा करण्याचा निश्चय केला होता. तिने याच काळात भगवदगीतेचे अध्ययन केले आणि रामआख्यानाच्या माध्यमातून पैसे जमा केले. रामायणाचा अभ्यास करताना प्रभू श्रीरामांचे अस्तित्व आणि त्यांचे महत्त्व याबाबत अधिक माहिती मिळाल्याचे ती आवर्जून सांगते. रामायणाची महत्ता लक्षात आल्यावर याच विषयावर आख्यान करण्याचा तिने निश्चय केला.
रामकथा ऐकणारे मंदिरासाठी दान करतात
भाविकाने आजवर चार ठिकाणी आख्यानांचे कार्यक्रम केले आहेत. राममंदिर उभे राहीपर्यंत आपला हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे ती सांगते. लहानगी भाविका स्थानापन्न होऊन जेव्हा आपले आख्यान सुरू करते तेव्हा ऐकणारे थक्क होतात. इतक्या लहान वयात आख्यान सादर करणारी भाविका ही देशातील कदाचित पहिली व्यक्ती असावी.
राममंदिर हे भारताचे राष्ट्रीय मंदिर आहे – भाविका भाविका आपल्या आख्यानात सांगते, राममंदिर हे भारताचे राष्ट्र मंदिर आहे. प्रभू श्रीरामांमध्ये भारताचा आत्मा वसलेला आहे. आजच्या विखुरलेल्या सामाजिक स्थितीत रामायणच आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. रामायणाचे सात कांड ही जीवनाच्या प्रगतीतील सात सोपान आहेत. रामायणाच्या वाचनाने मानवी जीवन सुखी होऊ शकते. रामायण हा केवळ धर्मग्रंथ नसून सामाजिक आणि नैतिक शांतता प्रदान करणारे महाकाव्य आहे.
**