HinduismNewsOpinionRashtra Sevika SamitiRSSSpecial Day

अखंड भारत संकल्प दिन.. १४ ऑगस्ट

akhand bharat sankalp diwas 14 august

१५ ऑगस्ट १९४७ साली आम्हाला ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. मात्र हे स्वातंत्र्य आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनानंतर मिळाले . हिंदुस्थान (hindustan )नामक आमच्या राष्ट्राचे धर्माच्या (खरं बोलायच तर उपासना पंथाच्या ) आधारावर २ तुकडे करण्यात आले.भारत आणि पाकिस्तान .. पाकिस्तान नाही “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान”. (islamic republic of pakistan)

धर्माच्या नावावर मातृभूमीचे विभाजन ही आमच्या इतिहासातील अकल्पित आणि समजुतीच्या पलीकडची मागणी होती. इतिहासात आमच्या देशावर हूण, कुशाण ,शक आणि यवन (अलेक्झांडर ) अशी ४ मोठी आक्रमणे झाली. आम्ही शत्रूशी प्राणप्रणाने लढलो. रणांगणात कधी आमची पीछेहाट झाली तर कधी आम्ही आगेकूच केली पण मातृभूमीचे विभाजन होऊ दिले नाही.. सरतेशेवटी अंतिम विजय आमचाच झाला. काही आक्रमक परत गेले काही इथेच राहिले. जे इथेच राहिले त्यांना आम्ही आमच्या संस्कृतीत समरस करून घेतले.

१९८० च्या दशकात कॅनडाहुन निघालेले एअर इंडियाचे “कनिष्क” (kanishka) विमान कार्गोत बॉम्ब ठेवून खलिस्तान अतिरेक्यांनी नॉर्थ अटलांटिक महासागरावर जमिनीपासून ३१००० फुटावर ३२९ प्रवाशांसह उडवून दिले होते. कोण होता हा राजा कनिष्क ? राजा कनिष्क हा कुशाण आक्रमकांपैकी एक राजा होता. आक्रमक असूनही तो या भूमीशी, संस्कृतीशी एकरूप झाला होता. आम्ही त्याला राजा म्हणून स्वीकारले पण मातृभूमीचे विभाजन होऊ दिले नाही.

“युगों-युगों से यही हमारी बनी हुई परिपाटी है, खून दिया है, मगर नहीं दी कभी देश की माटी है।” या आमच्या वचनबद्धतेला १४ ऑगस्ट १९४७ रोजी पहिल्यांदा तडा गेला.

आमच्या राष्ट्राची फाळणी (partition) ही आमच्या चिरन्तन राष्ट्राच्या आत्म्यावरची भळभळती जखम आहे… अगदी माथ्यवरचा मणी कापलेल्या अश्वथाम्याच्या भळभळत्या जखमेसारखी…

फाळणीने आम्ही काय गमावले..

सिंधू (sindhu)वाचून हिंदू (hindu) म्हणजे शब्दावाचून अर्थ , प्राणवाचून कुडी..” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्याख्येतील आमची अस्मिता… सिंधू नदी आम्हाला पोरकी झाली.

भगतसिंह , राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी ज्या कोट लखपत तुरुंगात फासावर चढवण्यात आले ते रावी नदीच्या किनाऱ्यावरील लाहोर आमच्या हातून सुटले. आज २३ मार्च रोजी पाकिस्तानात राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो. पण ते या क्रांतीकारकांना फाशी दिल्याच्या प्रित्यर्थ नाही तर त्याच रावी नदीच्या किनाऱ्यावरील लाहोर शहरात २३ मार्च १९४० रोजी पाकिस्तानचे नाव न घेता द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारावर मुस्लिम समुदायासाठी वेगळी भूमी मागण्याचा ठराव पारित करण्यात आला होता म्हणून.
( द्विराष्ट्र सिद्धांत ( two nation theory) : या देशात हिंदू आणि मुसलमान अशा दोन अगदी भिन्न संस्कृती असून दोन्ही संस्कृती एकत्र नांदूच शकत नाहीत त्यामुळे त्यांचे दोन वेगळे देश असावेत. )

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढून जायबंदी झालेल्या भारतीय जवानांना पंजाब प्रांताच्या रावी व चिनाब नदीच्या पठारावर वसलेले “ल्यालपूर” मध्ये ब्रिटिश सरकारने घर बांधण्यासाठी तसेच कसण्यासाठी जमीन दिली होती. आपल्या त्या बहादूर व कष्टाळू जवानांनी “जय जवान जय किसान” चा नारा खरा करत संबंध ल्यालपूर हिरव्यागार मोत्यांनी मढवून टाकले होते. ते ल्यालपूर आमच्या हातून निसटले. १९७७ साली पाकिस्तानचा लाळघोट्या पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो याने सौदी अरेबियाकडून फुकट पेट्रोल ,मिळेल या आशेने सौदीचे राजा किंग फैसल यांच्या स्मृती प्रित्यर्थ ल्यालपूरचे नाव बदलून “फैसलाबाद” केले.

त्या काळी ओळखली जाणारी ” जुळी मुंबई ” अर्थात “कराची”शी आमची ताटातूट झाली.( कराचीची सुप्रसिद्ध मिठाई “कराची हलवा” हा त्याकाळी “बॉम्बे हलवा” म्हणून देखील ओळखला जात असे ) इतके हे जुळ्यांचे दुखणे होते..

-इसवीसन पूर्व ५००० वर्षांपूर्वीच्या आमच्या सुसंस्कृत, सुसंपन्न, वैभवशाली नगररचनेचे पुरावे हडप्पा व मोहेंजोदारो सीमेपलीकडे राहिले..

-५१ शक्तिपीठांपैकी एक असलेले हिंगलाज माता शक्तीस्थान आमच्यापासून दुरावले..

-शीख संप्रदायाचे संस्थापक गुरदेव नानकांचे जन्मस्थान असलेले ननकानासाहेब आम्ही गमावले…

-जिथे शीख संप्रदायाची सुरवात झाली असे “करतारपुर दरबार साहिब गुरुद्वारा” (kartarpur gurdwara) सीमा रेषेपासून फक्त ४ किलोमीटर असूनही आम्ही गमावले.

-८ मे १७५८ रोजी झालेल्या पेशावरच्या लढाईत ज्यात मराठा साम्राज्याने (maratha empire) शिखांसमवेत पराक्रमाची शर्थ करून दुर्राणी साम्राज्याचा पराभव करून जिंकलेले ते पेशावर आमच्या नजरेआड गेले.

-मराठ्यांच्या भीमथडी तट्टानांनी अटकेपार जाऊन सिंधू नदीचे पाणी प्याले म्हणून पुण्यात दिवाळी साजरी झाली होती ती आमच्या शेजारी शत्रू देशाच्या अटकेत राहिली.

-समस्त हिंदू समाजाचे शक्तीपीठ असलेल्या ढाकेश्वरी मंदिराचा कळस आमच्या नजरेआड गेला.

-पंजाबमधील ५ नद्यांनी (रावी ,चिनाब ,झेलम ,सतलज , व्यास) समृद्ध केलेली सुजलाम सुफलाम भूमी आम्ही गमावली.

आम्ही मोजलेली फाळणीची किंमत..

-आमच्या किमान ६ लाख हिंदू बंधू- भगिनींच्या निर्घृण हत्येचे मोल आम्ही मोजले..

-आमच्या अगणित माता भगिनींवर झालेले अत्याचार ही प्राणापेक्षाही मोठी किंमत आम्ही मोजली.. त्यातील किती हिंदू भगिनी जबरदस्तीने निकाह करून बळजबरीने पाकिस्तानातच ठेवून घेतल्या गेल्या त्याची गणतीच नाही..

-किमान १ कोटी २० लाख हिंदू बांधव आपल्या वडिलोपार्जित जमीन-जुमला व स्थावर संपत्तीवर पाणी सोडून असहाय्यपणे भारतात आले.. मुलतानहुन आलेले हिंदी चित्रपट अभिनेते राज कपूर यांचे खानदान असो,सुनील दत्त यांचे कुटुंब असो, अथवा राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते मिल्खा सिंह असो किंवा सिंध प्रांतातील हैदराबादचे अध्यात्मिक क्षेत्रातील साधू वासवानी मिशन असो या विस्थापितांची यादी न संपणारी आहे.

-हिंदुस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे १/४ भूभाग आम्ही गमावला..

-पाकिस्तान हवे म्हणून मुस्लिम लीगला मतदान केलेला मुस्लिम मतदार फाळणीनंतर काही प्रमाणात पाकिस्तानात स्थलांतरित झाला मात्र मोठ्या प्रमाणावर इथेच राहिला. म्हणजे स्वतंत्र भारतात पाकिस्तान हवा असलेले जिहादी मानसिकतेचे देशद्रोही मुसलमान मुस्लिम लीग ऑफ इंडिया या नवीन नावाने इथेच राहिले.

-धर्माच्या आधारावर उभे राहिलेले, आमचा हिंदू काफिर म्हणून कायम द्वेष करणारे शत्रूराष्ट्र आमच्या शेजारी षडयंत्र रचून वसवले गेले.” चांगला शेजार तुमच्या घराची किंमत दुप्पट करतो” – जर्मन म्हण अर्थात वाईट शेजार तुमच्या घराची किंमत अर्धी करतो. पाकिस्तान शेजारी असल्याने आंतरराष्ट्रीय पटलावर आमची तीच गत झाली.

फाळणी होणार हे निश्चित झाले आणि कराची मधील हजारों हिंदूंचा लोंढा नेसत्या वस्त्रानिशी कराची बंदराकडे वळला. कर्तव्य भावनेने चंदू हलवाई या कराचीच्या धनाढ्य हिंदू मिठाईवाल्यांनी या आपल्या हजारों हिंदू बंधू भगिनींना कराची बंदरात जेवू घातले. एवढेच नव्हे तर प्रवासादरम्यान उपवास घडू नये म्हणून शिदोरी देखील बांधून दिली.. शेवटचा हिंदू कराची बंदरातून निघेपर्यंत चंदू हलवाई यांनी अन्नपूर्णेच्या रूपाने अविरत सेवा पुरवली. पुढे भारत सरकारने त्याचा मोबदला देऊ केला असता चंदू हलवाई यांनी नम्रपणे नाकारला.

फाळणी कोणी केली..

-लौकिकार्थाने फाळणी ब्रिटिशांनी कायदे आझम महम्मद अली जीनां“(muhammad ali jinnah)च्या खांद्यावर बंदूक ठेवून केली

१६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने वेगळ्या पाकिस्तानसाठी पुकारलेल्या direct action day च्या अपरिमित हिंसाचाराने ,विशेषतः नौखाली, कलकत्ता व संपूर्ण बंगालमधील हिंदूंच्या नृशंस हत्याकांडाने घाबरलेल्या काँग्रेसने फाळणीला संमती दिली.

मात्र फाळणीच्या कारणांच्या मुळाशी गेले असता मुख्यतः असंघटित व उदासीन हिंदू समाज याला जबाबदार असल्याचे लक्षात येते.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान” हा साफ फसलेला प्रयोग..

बलुचिस्तान मध्ये असलेले “स्टेट ऑफ कलात“च्या संस्थानिकाने तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांना (sardar vallabhbhai patel) फोन करून भारतात विलीन होण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र ब्रिटिश संसदेच्या हिंदुस्थान स्वतंत्रता कायद्याच्या तरतुदी प्रमाणे स्टेट ऑफ कलातची सीमा भारताला लागून नसल्याने हे विलीनीकरण अशक्य असल्याचे सांगून वल्लभभाईनी आपली असमर्थता व्यक्त केली. त्यावर जर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे हिस्से होऊ शकतात तर मग तुम्ही पूर्व हिंदुस्थान आणि आम्ही पश्चिम हिंदुस्थान असे का होऊ शकत नाही असा बिनतोड युक्तिवाद त्या संस्थानिकाने केला. मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. म्हणून हा प्रस्ताव अस्तित्वात येऊ शकला नाही. बलुचिस्तान मानाने पाहिल्यादिवसापासून पाकिस्तानचा घटक कधीच नव्हता. हे वरील उदाहरणाबरोबर आज बलुचिस्तानमध्ये सुरु असलेल्या सशस्त्र स्वतंत्रता आंदोलनापर्यंत सिद्ध करते.

काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली आहे हे कळल्यावर त्यावेळचे वजनदार पश्तुन नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी (khan abdul ghaffar khan) दिल्लीला आले आणि ” तुम्ही कोणाला विचारून फाळणीला मान्यता दिली ? तुम्ही आम्हाला लांडग्यांसमोर टाकले आहे ( you have thrown us to the wolves)” असे महात्मा गांधींना सुनावून पेशावरला गेले ते पुन्हा महात्मा गांधींना परत कधीच भेटले नाही..

-१९३० च्या दशकात सिंध प्रांताला मुंबई इलाख्यापासून वेगळे करण्यासाठी कारस्थान रचण्यात पुढाकार घेणारे व १९४३ साली सिंधच्या विधानसभेत पाकिस्तान निर्मितीचा ठराव मांडणारे सिंधचे नेते गुलाम मुर्तजा सय्यद पाकिस्तानच्या एकूण ढाच्याविषयी इतके निराश झाले की , आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात १९७२ सालापासून स्वतंत्र सिंधू देशाचा जोरदार पुरस्कार केला.” पाकिस्तान निर्मितीला हातभार लावल्याची शिक्षा म्हणून अल्ला ने मला हा अराजक माजलेला पाकिस्तान बघण्यासाठी इतके दीर्घायुष्य दिले आहे. “ अशी विषण्ण भावना ९१ व्या वर्षी आलेल्या मृत्यूपूर्वी ते बोलून दाखवत असत. आजही पाकिस्तानच्या सिंध प्रांतात वेगळ्या सिंधू देशासाठी ” जिये सिंध “( Jeay Sindh) नावाची प्रचंड मोठी चळवळ चालवली जाते.

-एक उपासना पद्धती (नमाज ) , एक धर्मग्रंथ (कुराण) , एक भाषा (उर्दू) या आधारावर उभे राहिलेलं इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे द्विराष्ट्र सिद्धांताचे तत्वज्ञान आपल्या स्थापने पासून २५ वर्षांच्या आत बंगाली भाषिक अस्मिते समोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडले. १९७१ साली पूर्व पाकिस्तान मध्ये बांगलादेश निर्मितीसाठी झालेली रक्तरंजित क्रांती ही धर्माधिष्ठित देश निर्मितीचा पाया ठिसूळ व तकलादू असल्याचे निदर्शनास आणते.

“अपनेवालोंका देश” म्हणून हिजरत करून आजच्या भारतातून पाकिस्तानात गेलेले मुहाजिर आजही पाकिस्तानच्या समाज जीवनाशी एकरूप होऊ शकलेले नाही. पाकिस्तानची जनता त्यांना कमी प्रतीचे नागरिक व गळ्यातील लोढणे समजते. मुहाजिरांची पाकिस्तानातील ओळख ” भुके नंगे मुहाजिर “ अशीच आहे. पंजाबी, सिंधी, बलोचि व पश्तुनी पाकिस्तान्यांबरोबर मुहाजिरांची कायम हाणामारी चाललेली असते. मुहाजिरांचा लाडका नेता अल्ताफ हुसेन गेली ३० वर्षे आपले जन्मगाव कराची सोडून जिवाच्या भीतीने लंडनमध्ये दडी मारून बसला आहे. पाकिस्तानात परतण्याची त्याची हिंमत देखील होत नाही. ही ” अपनेवालोंका देश” म्हणून हिजरत करून आजच्या भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुहाजिरांची दयनीय अवस्था..

-ज्या वेळी पाकिस्तानचे तुकडे होतील त्यावेळी पंजाब, सिंध, बलूचीस्तान व खबर पख्तुनख्वा सोबत मूहाजीरांना देखील कराची हैदराबाद (पाकिस्तान) परिसराचे वेगळे “मुहाजिरीस्तान” द्यावे लागेल अशी धमकी हे मुहाजिर पाकिस्तान सरकारला कायम देत असतात.

-याचा अर्थ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी घेतलेला एक उपासना पद्धती (नमाज ) , एक धर्मग्रंथ (कुराण) , एक भाषा (उर्दू) हा आधार किती नकली ,बनावटी, अनैसर्गिक, पोकळ आहे हे आपल्या लक्षात येते. एका इस्लामच्या आधारावर जर देश उभा करायचा होता तर पाकिस्तान निर्मितीपूर्वी जगात ५० हुन अधिक इस्लामिक देश का अस्तित्वात आले असते..

-फाळणीच्या वेळी अपनेवालों का देश म्हणून पाकिस्तानात गेलेले उर्दू भाषिक मुहाजिर पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या केवळ ८ % आहेत. याचा अर्थ राष्ट्र भाषा उर्दू असलेल्या पाकिस्तानातील केवळ ८% लोकसंख्या उर्दू बोलते. बाकी पंजाबमध्ये पंजाबी , सिंध मध्ये सिंधी , बलूचीस्तानमध्ये बलुची, व खैबर पख्तुनख्वा मध्ये पश्तू बोलली जाते. लिपीतील साधर्म्यामुळेव उर्दू विषयी असलेल्या अज्ञानामुळे आपल्याला या सगळ्या भाषा उर्दू वाटतात प्रत्यक्षात मात्र या सगळ्या भाषा वेगवेगळ्या आहेत. ज्या प्रमाणे देवनागरी लिपीतील संस्कृत, हिंदी , मराठी ,नेपाळी या चारही भाषा वेगवेगळ्या आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात उर्दूच्या लहेजामुळे मुहाजिर पटकन ओळखले जातात व त्यांना कस्पटासमान वागणूक मिळते.

-व्यावहारिक दृष्ट्या काफ़िरांच्या द्वेषावर उभा राहिलेला पाकिस्तान आज जागतिक आतंकवादी संघटनांचा अड्डा बनला आहे. पाकिस्तानात कोणतेही सरकार असो ते या आतंकवादी संघटनांचे पोशिंदे म्हणून आपली भूमिका चोख बजावतात. क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याने पाकिस्तानच्या अबोटाबाद मध्ये आश्रय घेतला होता यावरूनच पाकिस्तानची आतंकवादाविषयी असलेले सहानुभूतीचे धोरण उघडे पडते.

Identity crisis of pakistan…

आपण कोण ? हा प्रश्न पाकिस्तानला कायम सतावत असतो.

-पाकिस्तान आपला मूळ पुरुष मोहम्मद बिन कासीम याला मानतो. त्यांच्या सरकारी वेबसाइट वर तसा स्पष्ट उल्लेख केला गेला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार मोहम्मद बिन कासीम ने सिंधवर आक्रमण करून ज्या दिवशी पहिले १३ मूलनिवासी अंधार युगातून ( जाहिलियत) इस्लामच्या प्रकाशात आणले त्याच दिवशी पाकिस्तानच्या निर्मितीची पहिली वीट रचली गेली होती. १४ ऑगस्ट १९४७ रोजी फक्त त्याचे प्रकटीकरण झाले. मात्र त्याच पाकिस्तानला उत्खननात आपल्या पायाखाली सापडलेली इसवी सन पूर्व ५००० वर्षांपूर्वीची सुसंस्कृत, सुसंपन्न, वैभवशाली हडप्पा व मोहेंजोदारो नगरे सापडलेली असताना आपले पूर्वज अंधार युगात कसे काय होते ? याचे समर्थन देखील करता येत नाही व या ऐतिहासिक सत्याला नाकारताही येत नाही.

-मी कोण याचा शोध घेताना आज सर्वसामान्य पाकिस्तानी सिंधी मुसलमान नागरिक ” ७५ वर्षांपासून मी पाकिस्तानी आहे , ७५० वर्षांपासून मी मुसलमान आहे आणि ७५०० हजार वर्षांपासून मी सिंधुपुत्र आहे ” या निष्कर्षाप्रत येऊन पोहचतो तेव्हा त्याचा आपण पाकिस्तानी असल्याचा भ्रम गळून पडतो.

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पश्तुनांनी नाही ब्रिटिश अंमल मानला नाही ब्रिटिशांनी आखलेली ड्युरांड लाइन (durand line) मानली नाही रशियन वर्चस्व मानले पाकिस्तानची राजवट तर त्यांच्या खिजगणतीतही नाही. ते स्वतःला पठाण वंशाचे अर्थात पश्तुन समजतात.पाकिस्तानी म्हणून त्यांचे कुठले ही वैचारिक अथवा भावनिक लागे बांधे नाहीत.

” अपनेवालोंका देश” म्हणून हिजरत करून आजच्या भारतातून पाकिस्तानात गेलेले मुहाजिर त्यावेळी पाकिस्तानची राजधानी असलेल्या कराची आणि जवळ असलेल्या हैदराबाद शहरात विसावले. मुहाजिराच्या लोंढ्याने या दोन्ही शहरांच्या लोकसंख्येचा अनुपात बदलला तेथील मूलनिवासी मुसलमान सिंधी समाज एका रात्रीत अल्पसंख्यांक झाला. मात्र या उर्दू भाषिक मोहाजीरांना पाकिस्तानने आजतागायत स्वीकारलेले नाही. तिथे त्यांची जी ससेहोलपट चाललेली आहे त्यामुळे फाळणीच्या वेळी पाकिस्तानचे आपणच निर्माते व भाग्यविधाते असल्याच्या थाटात तोरा मिरवणारे मोहाजीर आज अगतिक होऊन सिंधी समाजाला आपलेसे करण्यासाठी सिंधला “सिंधमाता” (sindh mata) म्हणत आहेत. हिंदुस्तानात असताना फाळणीपूर्वी भारत माता कि जय किंवा वंदे मातरम म्हणण्यासाठी तोंडाला लकवा मारलेले “एहसान फरामोश” मोहाजिर आज सिंध मातेचा जयजयकार करत नरडं सुकवत आहेत.

पाकिस्तानचा प्रत्येक समाज घटक Identity crisis ने ग्रस्त आहे. पाकिस्तानचा डोलारा आपल्या अंतर विरोधाने केव्हाही कोसळू शकतो.

अखंड भारताची (akhand bharat) आवश्यकता …

-आपल्या भारत भूमीला आपण “भारतमाता” मानतो. १४ ऑगस्ट १९४७ साली भारतमातेची मूर्ती खंडित झाली आणि भग्न मूर्तीची पूजा आपण निषिद्ध मानतो. त्यामुळे भारत मातेच्या अखण्डित मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करणे आपले आद्य कर्तव्य आहे.

-आपल्या मातृभूमीचे विभाजन अनैसर्गिक व कृत्रिम आहे. अनैसर्गिक गोष्ट काळाच्या ओघात नष्ट होते. तसेच आज ना उद्या नैसर्गिकरित्या अखंड भारत होणारच आहे आपण पुरुषार्थ दाखवल्यास ते लवकर होईल इतकेच !

-भारताचे डिफेन्स बजेट अंदाजे वर्षाला ६ लाख कोटी इतके प्रचंड आहे. यातील अंदाजे किमान निम्मा भाग पाकिस्तान सीमेवर खर्च होतो. अखंड भारताच्या निर्मितीने हे वाचलेले ३ लाख कोटी विकास व विधायक कामांवर जनतेच्या उत्कर्षासाठी सत्कारणी लावता येतील.

-फाळणीच्यावेळी ज्यूट चे उत्पादन त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांग्लादेशात होत असे तर ज्यूट पासून बनवण्यात येणाऱ्या गोण्या , पिशव्या , धागे यांचे कारखाने कलकत्याला अर्थात भारतात होते. फाळणीमुळे ज्यूटचा सगळा व्यापार जवळपास बंद पडला. आजही पाकिस्तानमध्ये उच्च प्रतीचा कापूस पिकवला जातो. मात्र त्या कापसापासून कापड बनवणाऱ्या गिरण्या भारतात आहेत. अश्या प्रकारे अनेक उत्पादनांची यादी देता येईल.

-नद्यांचे विभाजन हे व्यावहारिक दृष्ट्या अत्यंत अनैसर्गिक व कृत्रिम आहे. भारत पाकिस्तानमध्ये जवळपास प्रत्येक नदीवरून पाणी वाटपाचा तंटा आहे. तो आपोआप समाप्त होईल.

-पाकिस्तान ने आपल्याशी ४ युद्धे केली, या ४ ही युद्धात भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडून टाकले त्यामुळे पाकिस्तान आज छुप्या आतन्कवादाने भारताशी छद्मी युद्ध खेळतो त्यातही पाकिस्तान भारताशी जिंकू शकत नाही. मात्र त्यात आपली अपरिमित जीवित व आर्थिक हानी होते. ही हानी सहज टाळली जाऊ शकते.

-अखंड भारताच्या निर्मितीने इराण मधून संबंध देशभरात पाइपलाइन्सद्वारे गॅस ,कच्चे तेल लीलया पोहचवता येईल. आपल्या अखंड ऊर्जेच्या गरजेची परिपूर्ती अगदी सहजगत्या होईल.

-दोन्ही देशातील धार्मिक यात्रेकरूंना सुलभतेने आपल्या धार्मिक परंपरांचे पालन करता येईल. जसे की , भारतातील शीख बांधव ननकानासाहिब व कर्तारपूरला तर पाकिस्तानातील हिंदू बांधव देव दर्शन व अस्थि विसर्जनासाठी कॊणत्याही अडथळ्याविना ये- जा करू शकतील.

-पाकिस्तानच्या निर्मितीमुळे या देशात रक्तपात केला ,मुडदे पाडले की धर्माच्या नावावर वेगळी भूमी मिळते असा समज झाला. त्यातूनच खलिस्तान सारख्या वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या हिंसक चळवळी उभ्या राहिल्या. बरं या खलिस्तान्यांना वेगळा खलिस्तान म्हणून फक्त भारतातातला पंजाब हवा आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांताबद्दल ते अवाक्षरही बोलत नाहीत. त्यामुळे खलिस्तानची चळवळ संपुष्टात आणायची असेल तर अखंड भारताला पर्याय नाही.

कसा होईल अखंड भारत ?

-अखंड भारत ही नियती आहे ती आपण आपल्या पुरुषार्थाने आपण लवकर खेचून आणू हा अपरंपार विश्वास आपण बाळगला पाहिजे.

-जवळपास २० कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानवर १० -१५ अणुबॉम्ब टाकून तो नष्ट करून आपल्याला अखंड भारत साकारता येईल अश्या वेडगळ कल्पनांना तिलांजली द्यावी लागेल.

-काळाच्या ओघात काही अपरिहार्य कारणांमुळे आपल्या पूर्वजांनी उपासना पंथ बदलला असेल पण सांस्कृतिक दृष्ट्या आपण एकच आहोत. याची अनुभूती शेजारील देशांना द्यावी लागेल. यात पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका ,ब्रम्हदेश , अफगाणिस्तान हे एकेकाळी अखंड भारताचे अभिन्न अंग असलेले सगळे देश आले. आज स्वतंत्र अस्तित्व असलेले परंतु भारताचे सहोदर असलेले नेपाळ व भूतान हे याचे उत्तम उदाहरण आहे.

-शेजारी देशांना ही सांस्कृतिक ऐक्याची अनुभूती देण्यासाठी सर्वार्थाने ” हिंदू म्हणून” आपल्याला सुसंघटित, आत्मनिर्भर तसेच सर्वार्थाने बलशाली व्हावे लागेल कारण बलशाली राष्ट्राचे सगळेच आपोआप मित्र होऊ लागतात.त्यासाठी “स्व” चे जागरण अत्यन्त महत्वाचे आहे .

-सांस्कृतिक दृष्ट्या आपल्या उज्वल परंपरा परिपुष्ट कराव्या लागतील. आपल्यातील विकृती नष्ट करून टाकाव्या लागतील. आपल्या संस्कृतीचे जे सर्वसमावेशकता हे वैशिट्य आहे त्याचे पूर्वजागरण करावे लागेल.

“स्व” चे जागरण करताना इतिहासातील चुका आपल्याला टाळाव्या लागतील.

उदाहरणार्थ :- भारत स्वतंत्र झाला संस्थानांच्या विलीनीकरणावेळी राजस्थान मधील अमरकोटच्या राणा चंदर सिंह या संस्थानिकाने आपल्या समोर असलेल्या जोधपूर संस्थानाशी असलेल्या पिढीजात वैरामुळे भारतात विलीन होण्याचा पर्याय उपलब्ध असूनही पाकिस्तानात विलीन होण्याचा पर्याय निवडला. राजा हिंदू प्रजा हिंदू मात्र तरीही राणा चंदर सिंहाने जोधपूर संस्थान भारतात विलीन झाले म्हणून पाकिस्तानात विलीन होण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. पाकिस्तानने आपल्या फितरतीप्रमाणे अमरकोटचे नाव बदलून “उमरकोट” केले. इथे आपल्याला पाकिस्तान व इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान यातील फरक कळतो. आज उमरकोटच्या हिंदूंची दयनीय अवस्था आहे. “स्व” चे जागरण करताना इतिहासातील या चुका टाळून आपल्याला स्व चे भान ठेवावेच लागेल.

अखंड भारताचा संकल्प (akhand bharat sankalp diwas) करून आजचा १४ ऑगस्टचा दिवस साजरा करूया..

भारत माता की जय…

Back to top button