NaxalismOpinion

लाल कॅन्सर : देशाला लागलेला दुर्धर आजार

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारताचे अजून काही तुकडे करण्याचे प्रयत्न पहिल्यापासून सुरू झाले होते. त्यात अंतर्गत शक्ती होत्या आणि बाह्य शक्ती दोन्ही होत्या. या दोन्ही शक्तींचे बेमालूम मिश्रण आमच्या समाज आणि राष्ट्र जीवनात झाले. त्यातून ज्या कॅन्सरची निर्मिती झाली, ज्या गाठी निर्माण झाल्या त्या बऱ्या होण्याचे नावच घेत नाहीत.

ब्रेकिंग इंडिया वर काम करणाऱ्या मंडळींनी आमची एक एक दुर्बळ कडी निवडून त्यावर काम करायला सुरुवात केली. जणू गिधाडांची शिकारीची वाटणीच करून घेतली. त्यातील एक दुर्बळ कडी होती आमचे वनवासी बंधू ! यांच्या वर लक्ष केंद्रित केले सुरुवातीला मिशनऱ्यांनी आणि नंतर डाव्यांनी या भक्षावर आपले लक्ष वळवले.

भक्ष्य हा शब्द जाणीवपूर्वक वापरला कारण जी वृत्ती शिकाऱ्याची असते तीच वृत्ती या मंडळींची. कोण आहेत हे डावे नक्षलवादी ? काय उद्देश आहे त्यांचा? कधी तरी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल.

वनवासी बंधू हे मुळात लढाऊ ! रामायण काळापासून वनात राहणारा हा आमचा बंधू एक आदर्श समाज जीवन जगत होता. त्यांनी निर्माण केलेले संस्कृती आणि जीवन मूल्य ही आदर्श होती. इंग्रजांच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने सशस्त्र लढ्याला सुरुवात या आमच्या बंधूंनीच केली. इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध जे दमन चक्र वापरले त्यात जे कायदे केले ते कायदे दुर्दैवाने आज ही अस्तित्वात आहेत. शहरातील सरकार नावाची गोष्ट ही तुमची शत्रू आहे हे इंग्रजांच्यामुळे निर्माण झालेली भावना ज्यांनी जाणीवपूर्वक तशीच ठेवत मिशनरी आणि डावे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तो असंतोष वापरला.

नक्षलवादी मंडळी म्हणजे नेमके कोण ? स्वतंत्र  भारतात कामगार आणि विद्यार्थी यांच्यातील अस्वस्थता आम्हाला लाल क्रांतीसाठी अनुकूल ठरेल म्हणून लाल माकडांनी येथे पक्ष स्थापन केला मग ते सरकारी जागांवर जाऊन बसले. शिक्षण क्षेत्रात घुसले. काही माकडे थेट काँग्रेसमध्ये जाऊन सत्तेच्या माध्यमातून डावा अजेंडा राबवू लागले आणि जेव्हा लोकशाहीच्या चौकटीत डाळ शिजेना तेव्हा यातील एक गटाने फुटून हिंसक मार्ग स्वीकारला. लोकांच्या दृष्टीने हे जरी दोन गट होते तरी ही धूळफेक होती. आम्ही लोकशाही व्यवस्थेत राहून ती खिळखिळी करतो तुम्ही बाहेरून वनवासी बंधूंना हाताशी धरून युद्ध पुकारा असे ठरलेले धोरण होते. परिणाम एकच साधायचा होता तो म्हणजे लाल क्रांती.

बिहार, झारखंड, ओरिसा, बंगाल, आंध्र, महाराष्ट्र आणि छत्तीसगड ते थेट राजस्थान पर्यंतचा वनवासी भाग लक्ष करून हे उद्योग सुरू झाले. 1967 ला. गेल्या 53 वर्षात या लोकांच्या कारवायात हजारो सैनिक आणि नागरिक बळी गेले . विकासाच्या कुठल्याही योजना यशस्वी होऊ न देणे कुठले ही आरोग्य, शिक्षण, रोजगाराचे प्रश्न सुटणार नाही याची काळजी घेणे. हातात शस्त्र देणे आणि त्यांनाच सैन्या विरुद्ध उभे करणे, पोलिसांच्या विरुद्ध उभे करणे. माणसे मारले गेले की पुन्हा स्थानिक भावना उद्दीप्पीत करत आणखी recruitment करणे हे त्यांचे धोरण.

याची दुसरी बाजू म्हणजे शहरी स्लीपर सेल उभे करणे. हा शब्द आणि शहरी माओवाद हा शब्द आपण अलीकडे ऐकत असलो तरी हे स्लीपर सेल तयार करण्यासाठी साहित्य आणि चित्रपट हे माध्यम डाव्यांनी वापरली. या दोन्ही माध्यमात डाव्यांनी चांगलाच जम बसवत फिल्म इन्स्टिट्यूट ते NSD पर्यंत ताबा मिळवत शॉर्ट फिल्म, तथाकथित आर्ट फिल्म आणि प्रायोगिक नाटकातून प्रचार सुरू केला. आक्रोश सिनेमा आठवा. पथेर पंचाली आठवा. असे अनेक ज्यात या लाल माकडांनी कलात्मक साज चढवून एक नकारात्मक छबी भारताची तयार केली. याच सिनेमाना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळायला लागले. त्यांच्या चर्चा. समीक्षणे आणि त्यातुन आज जो शब्द प्रसिद्ध झाला तो इको सिस्टीम यांची विकसित झाली. यातले कुणी प्राध्यापक, कुणी कवी, कुणी नट याना पुरस्कार. हेच सेलिब्रेटी ! या आणि कामगार संघटनांच्या ताकदीवर यांनी आपले पैसे उभे करण्याचे शास्त्र उभे केले आणि यातून लाल क्रांतीचे स्वप्न पुढे नेण्याचे स्वप्न ते पाहत राहिले. त्यांच्या या सगळ्या कृतीचा एक भाग म्हणजे काल छत्तीसगड मधील विजापूर भागात जवानांवर झालेला हल्ला आणि 22 जणांचे बलिदान ! अजून संख्या वाढू शकते ! 

कोण आहेत याला जबाबदार? भारतात राहून स्वतःला कॉम्रेड म्हणवून घेणारे सगळे याला जबाबदार आहेत. या लाल माकडांचा सत्तेसाठी उपयोग करून घेणारे या नरसंहाराला जबाबदार आहेत. आपल्या स्वतःच्या नोकरीत डाव्या कामगार संघटनांचे सदस्यत्व स्वीकारून स्वतःला कॉम्रेड म्हणवणारे याला जबाबदार आहेत. चित्रपट ही कला आहे, साहित्य हे साहित्य आहे असे सांगून यांच्या कृत्यावर पांघरूण घालणारे विचारवंत या नरसंहाराला जबाबदार आहेत. वनवासी क्षेत्रात आर्थिक उद्योग उभे करून किंवा सामाजिक उद्योग उभे करून याना आश्रय देणारे पण याला जबाबदार आहेत. हे कुणी मेणबत्त्या आता पेटवणार नाहीत, हे कुणी आता ट्विट करणार नाहीत. उलट यावर एक कादंबरी लिहतील. सिनेमा काढतील. आम्ही हे बलिदान विसरून जाऊ आणि सिनेमा, साहित्य यात बुडून जाऊ. या हल्ल्यात कुणाचा भाऊ,  कुणाचा पती कुणाचे वडील गेले आहेत.  पण आम्हाला काय त्याचे ?

साधारण ६५/६७ मध्ये भारतात कॅन्सर या आजाराने दखल घेण्याजोगे अस्तित्व दाखवायला सुरू केले होते. जगात संशोधने होत आहेत उपाय सापडत नांही. आमच्या राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनात हा माओवादी, लेनिनवादी लाल कॅन्सर कधी बरा होणार ? अजून किती आम्हाला बळी बघावे लागणार ? हा लाल रक्तरंजित आजाराचा इतिहास तुकड्यात बघून चालणार नाही. या रोगाची गाठ वनवासी क्षेत्रात दिसत असेल, रक्त सांडणारी जखम तेथे असली तरी याचे हात पाय शहरात, केरळ, बंगाल येथे पण आहेत. या आजाराचा संसर्ग JNU त आहे,  जाधवपूर युनिव्हर्सिटीत मध्ये आहे, अगदी कोरेगाव भीमा मध्ये ही ह्या लाल संसर्गाने डोके वर काढले आहे.

त्या मुळे यावर उपाय पण एकात्मिक शोधावा लागेल. कॅन्सरला मलमपट्टी नाही पूर्ण ऑपरेशन आणि रेडिएशन लागतात आणि सरकार, पोलीस किंवा सैन्य हे पूर्ण करू शकणार नाही त्यासाठी जनतेला पुढे यावे लागेल. वनवासी बंधुनी त्यांना झिडकारण्यास सुरुवात केलीच आहे आम्ही शहरवासी याना कधी झिडकारणार ? हा खरा प्रश्न आहे ! 

 बलिदान दिलेल्या या जवानांना विनम्र श्रद्धांजली !

  • रवींद्र मुळे, नगर
Back to top button