दुष्ट प्रवृत्तीच प्रारूप म्हणजेच ‘रावण’
![](https://vskmum.s3.ap-south-1.amazonaws.com/wp-content/uploads/2022/10/HD-wallpaper-shri-ram-dashanan-hinduism-lanka-monkeys-ramayan-ravan-shree-ram-vishnupuran-thumbnail-338x470.jpg)
{रावणाचे दहन करू नका, पूजन करा नाहीतर…आदिवासी संघटनेची मोठी मागणी…सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमोलवर यांना आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी विकास संघटनांनी निवेदन देत रावण दहनाला विरोध दर्शविला आहे.}
हिंदू (hindu) समाजाचे सण उत्सव जसे येऊ लागतात तश्या हिंदूविरोधी,साम्यवादी,कम्युनिस्ट शक्ती सण उत्सवांचा अपप्रचार करण्यासाठी कामाला लागतात. आपला हिन्दु विरोधी अजेंडा सुरु करतात. नवरात्र ही शक्तीची उपासना आहे. आणि दसऱ्याला रावण दहनाने त्याचा समारोप होतो. रावण दहनाचा भाग जसा जवळ येऊ लागतो तसतसा डाव्यांना रावणाचा पुळका येऊ लागतो. त्या पुळक्याला कुठलाही आधार नसतो.
रावण(ravana) हा संगीत तज्ञ, राजकारणी, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता.त्याला काही लोकं विद्वानही म्हणतात, पण विद्वान तोच असतो, जो विचार आचरणात आणतो. रावणाने कधीच चांगला विचार आचरणात आणलेला नाही. रावण चांगला ज्योतीषी होता, त्रिकालाचं ज्ञान त्याच्याकडे असतांना, त्या ज्ञानाचा फायदा समाजाला करण्यापेक्षा तो स्वत:च्या हिताच्या आड जो जो येतोय त्याला त्याला संपवत होता. कामधेनू सारखं गोधन रावणाकडे होतं, पण रावणाने त्याचाही दूरुपयोग केला. रावण स्वतः साधक होता, पण त्याने त्याच्या साधनेचा उपयोग स्वताःच्या स्वार्थासाठी केला. त्या साधनेतून रावनाला भगवान शंकराने आत्मलिंग प्रदान केल होत, त्यातून समाजहीत व्हाव असा भगवान शंकराचा मानस होता, पण रावणाने तसे न करता हिमालयचं उचलण्याचा प्रयत्न केला होता.
सीतामाईला पळवणे हा रावणाचा अक्षम्य अपराध होता.दुसऱ्याच्या धर्मपत्नीला पळवणे हा दुराचाराचा कळस होता.त्यामुळे त्याचे उरलेसुरलेले पुण्य देखील नाहीसे झाले.ज्यावेळेस सीतेने लक्ष्मण-रेषा ओलांडली त्याचवेळी रावणाचे मरण निश्चित झाले, एकीकडे लक्ष्मणाने शुर्पनखेचे समाजहितासाठी नाक कापले, शुर्पनखेचा हेतु योग्य नव्हता त्यामुळे लक्ष्मणाने तिच्यावर म्हणजे तिच्या हेतूवर प्रहार केला. जेंव्हा रावणाला हे कळालं तेंव्हा रावणाने स्त्री चा अनादर केल्याबद्दल रामांना खोट्या तत्वज्ञानाच्या गोष्टी ऐकवल्या.तेव्हा दुसऱ्याची बायको पळवणे हा काय धर्म होता ?
अहंकार हा कधीच चांगला नसतो. संतांनी म्हंटलंय “तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरु तो समान भार देवा”. परमेश्वराला अहंकार तिळा एवढाही आवडत नाही आणि रावण तर अहंकाराने ओतप्रोत होता.एकीकडे रावण प्रचंड साधना करायचा, एखादा साधक दुसऱ्या साधकाला कसाकाय अडचणीत आणू शकतो? पण रावणाने सतत महर्षि विश्वामित्र ह्यांच्या ज्ञान-विज्ञानाच्या प्रयोगात सतत अडचणी आणल्या, मारिच आणि सुबाहू सारख्या दुष्ट शक्तीला पाठवून त्यांची साधनास्थळ, यज्ञस्थळ नष्ट करायचा. समाजाच्या कल्याणात चांगला माणुस कधीच येत नसतो. समाजहिताआड तीच माणसं येत असतात जी राक्षसी विचाराची असतात.
“एकोहम् द्वितीयोनास्ती। न भूतो न भविष्यती॥” म्हणजे मी एकटाच माझ्या सारखा दुसरा कुणीच नाही, न भूतकाळात झाला, ना तो भविष्यकाळात होईल असं रावणाचा अहम भाव होता,इतका अहंकारी रावण होता.रावण निर्दयी,स्वार्थी,विषयांध, स्त्री शक्तीचा अनादर करनारा,सत्तालोलूप, गर्विष्ट, अन्याय करणारा, समाजहिताचा विचार करणारा नव्हता.मनात आणले असते तर हनुमान देखील सीतामातेला घेऊन आले असते,पण ते कार्य जगत्पालकांच्या हातूनच होणार होते.
म्हणतात ना;-
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
भावार्थ:-
सत्पुरुषांचे,सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी धर्माची पुनः स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे अवतार धारण करतो.
म्हणूनच रावण हा वाईट विचारांचे प्रतीक आहे.तो वाईट विचार हा जाळलाच पाहीजे.