CultureNewsSpecial Day

सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती राजर्षी शाहू महाराज

१९ व्या शतकाच्या सुरवातीला मराठेशाही संपून इंग्रजांच्या राजवटीला सुरवात झाली आणि महाराष्ट्रात खर्याा अर्थाने आधुनिक युगाच्या निर्माणालाही सुरवात झाली. याच कालखंडात प्रखर राष्ट्रवादाचा जन्म झाला. या बरोबरच महाराष्ट्रात सामाजिक विषमता निर्मूलन चळवळींनीही पाय पसरायला सुरवात केली होती. या सगळ्याची पार्श्वभूमी अतिशय दयनीय होती. जातीय विषमतेने कळस गाठलेला होता. अस्पृश्यांना पशूपेक्षा हीन वागणूक दिली जात होती. स्त्रियांना बालविवाह व सतीप्रथेसारख्या अनेक अमानवीय चालीरीतींना बळी पडावं लागत होतं. शिक्षणाविषयी प्रचंड उदासिनता आणि आबाळ होती. अशावेळी राजपदाचा वैयक्तिक सुखासाठी उपयोग करण्याऐवजी बहुजन समाजाला सामाजिक आणि धार्मिक बंधनातून मुक्त करायला सर्वात आधी पुढे आलेले राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज.

समरसता हे एक जीवनमूल्य आहे आणि लोक-आराधना हाच त्याचा आधार आहे, याची जाणीव शाहू महाराजांनी (rajarshi shahu maharaj) आपल्या जीवनातून जगाला करुन दिली. शिक्षण, समता व न्यायावर आधारित आणि जातीभेद विरहीत लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे हे स्वप्न ज्यांनी पाहीले आणि त्यासाठी आजीवन कार्यरत राहीले.

अस्पृश्य समाजाच्या व्यथांची जाणीव असणारा महात्मा फुले(mahatma phule) यांच्यानंतर एखादा अपवाद वगळता फार काही कार्य होताना दिसत नव्हते. अशा वेळी शाहू महाराज ग्रीष्मात थंड हवेचा झोत यावा तसे आपल्या प्रजाजनाच्या जीवनात सुखासमाधानाची लहर बनून आले. अवघे २० वर्ष वय असलेले शाहू महाराज छत्रपती म्हणून अतीव उत्साहाने कामे करत होते. अनेक खेड्यांना भेटी देताना गावकरी-शेतकऱ्यांना शाहू महाराज सहज भेटत. त्यांच्या प्रश्नांविषयी शाहू महाराज त्यांच्याशी सरळ संवाद साधत. हे करत असताना आपली गरीब, दलित प्रजा कोणत्या प्रकारचे अन्न खाते, अंगावर कशा चिंध्या वापरते, तिला दैनंदीन जीवनात कोणते प्रश्न भेडसवतात हे ते जाणून घेत.

खेडूतांच्या साध्या अन्नाचे आनंदाने सेवन करत. प्रजेच्या तक्रारी व प्रश्न शांततेने ऐकून घेत आणि ती दूर करण्यासाठी तत्काळ उपाय योजना करत. यामुळे प्रजेमध्ये आपल्या राजाविषयी अत्यंत आदर, जिव्हाळा आणि प्रेम उत्पन्न झाले. त्यांनी मोठ्या अधिकार्यांअच्या जागी बहुजन वर्गातील व्यक्तिंची नेमणुक केली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या दिमतीला गरीब वर्गातील लोक ठेवले. हेतु हा की गरीब वर्गासाठी जे हुकूम काढले त्याची नीट अंमलबजावणी होते की नाही हे त्यांच्याकडून कळावे.

बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उध्दार होणार नाही. त्यांच्या मागासलेपणाचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यातील शिक्षणाचा आभाव हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी दुर्बल, निरक्षर, मागासवर्गीय आणि दलित या बहुजनांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या अनेक योजना आखल्या आणि त्या प्रत्यक्षात आणल्या. आपल्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे शंभर शाळा काढल्या. खेड्यापाड्यातून येणार्याल विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय व्हावी म्हणुन शाहू महाराजांनी वसतिगृहे बांधली. त्याच प्रमाणे विविध समाजातील लोकांना अनुदान देऊन वसतिगृहे बांधण्यास प्रोत्साहनही दिले.

सातव्या एड्वर्डच्या राज्यारोहणाला उपस्थित राहण्यासाठी शाहू महाराज इंग्लंडला (england) गेले. तिथून अनेक अनुभव आणि योजना घेऊन परत आले. मागासवर्गीयांची प्रगती करण्याच्या त्यांच्या धोरणाला चालना मिळाली आणि २६ जुलै १९०२ ला करवीर गझेट्मध्ये त्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात म्हंटले होते की मागासवर्गीयांनी उच्च शिक्षण घेण्यास उद्युक्त व्हावे म्हणुन त्यांना सरकारी खात्यात पूर्वीपेक्षा अधिक नोकर्या् द्याव्यात असे आपण ठरविले आहे. तरी या जाहीरनाम्याच्या दिवसापासुन ज्या जागा रिकाम्या होतील त्यातील ५०% जागांमध्ये मागासवर्गातील सुशिक्षित तरुणांची भरती करावी. सर्व सरकारी कार्यालयामध्ये जेथे जेथे ५०% पेक्षा कमी नोकर असतील तेथे तेथे ह्या वर्गातील तरुणांची नेमणुक करावी. हा केवळ साधा जाहीरनामा नव्हता तर भारतात दिले गेलेले पहिले आरक्षण होते. त्यामुळेच तो जाहीरनामा कोल्हापुरच नव्हे तर संपुर्ण भारतात नव्या युगाच्या आगमनाची नांदी घेऊन आला.

समाजक्रांतीचे हे कार्य शाहू महाराजांनी केवळ आपल्या संस्थानापुरते मर्यादित न ठेवता इतर संस्थानिकांनाही उद्युक्त केले. इंदूरच्या महाराजांना या संबंधात ते म्हणतात की “लग्नकार्यातील जातीबंधने मोडून काढून राजघराण्यातील मुलांनी ज्या मराठा कुटुंबांची सत्ता व प्रतिष्ठा त्यांच्यापेक्षा कमी दर्जाची आहे, अशा घराण्यातील मुलींशी संबंध जोडावेत.” उच्च जातींच्या लोकांनी कनिष्ठ जातींच्या लोकांशी विवाह जोडावेत असे त्यांचे मत होते.

पुढे ते म्हणतात, “आपण अस्पृश्यांना अमानुष वागणूक देतो. परिणामी ते इस्लाम किंवा ख्रिचन धर्म स्वीकारतात. धर्मांतर केलेल्या त्या लोकांना स्पर्श करायला आपल्याला अयोग्य वाटत नाही. असा भेदभाव वेदांत सांगीतलेला नाही. ह्या गोष्टीत मी पुढाकार घेतल्यामुळे लोक माझे अनुकरण करतील.”
शाहू महाराजांनी हिंदु वारसाहक्काचा निर्बंध १७ जानेवारी १९२० रोजी संमत केला. त्या निर्बंधाप्रमाणे शूद्रांची अनौरस संतती आणि ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवर्णांची अनौरस संतती यांच्या वारसाहक्कातील तफावत नष्ट करण्यात आली. हे नियम देवदासींनाही लागू करण्यात आले. यावरुन शाहू महाराज आपल्या कालखंडाच्या किती पुढे होते हे जाणत्यांच्या लक्षात येईल.

छत्रपती शाहू महाराज हे अस्पृश्यवर्गाचे तसेच पददलितांचे कैवारी आहेत अशी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. मात्र अश्पृशांनी आपला नेता त्यांच्याच समाजातुन त्यांनी स्वत: निवडावा असे त्यांचे म्हणणे होते. २२ मार्च १९२० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली माणगावला अस्पृश्यांची एक परिषद बोलावली होती. शाहू महाराज हे परिषदेचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेबांची प्रसंशा करतानाच शाहू महाराजांनी आता तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे, त्याच्या पाठीमागे सर्वशक्तिनिशी उभे रहा असा सल्ला जमलेल्या अस्पृश्यवर्गाला दिला.

राजर्षींचे जातिभेद निर्मूलनाचे कार्य असो, अस्पृशता निवारणाचे कार्य असो वा शिक्षणप्रसाराचे कार्य असो, कृतीयुक्त सामाजिक समरसता समाजात निर्माण व्हावी आणि सामाजिक न्यायाची स्थापना व्हावी, असे त्यांना वाटत होते. स्वतंत्र भारतात झालेले सामाजिक सुधारणांचे सगळे प्रयत्न महाराजांनी त्यांचा संस्थानात स्वातंत्र्यापूर्वीच केले होते. म्हणूनच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शाहू महाराजांना “सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष” अशा शब्दांत गौरविले आहे.

लेखक :- काशिनाथ पवार, पुणे

सदस्य : समरसता साहित्य परिषद – महाराष्ट्र राज्य

Back to top button