CultureOpinion

ऐका सरस्वतीबाई तुमची कहाणी …

ऐका सरस्वतीबाई तुमची कहाणी. हिमालयाला एक कन्या होती. लखलख स्वच्छ पाण्याची. हिमालयाच्या खांद्यावरून सरसर सरसर वाहत होती. वाटेतील खडक फोडत वेगाने ती धावत होती. एक दिवस काय झालं? तिला दोन बहिणी भेटल्या. एक निळी शतद्रू होती. दुसरी काळी यमुना होती. आता सरस्वती महानदी झाली. पुढे नदी सिंधूसागराला मिळत होती. अशी कैक युगे लोटली.

मग पुढे काय झाले? यमुनाबाई रुसून गेली. करता करता एक दिवस ती गंगेमध्ये विलीन झाली. आणखीही काही शतकं उलटली. सरस्वतीच्या काठाने आश्रम उमलले. तेथील ऋषींनी सरस्वतीला आई म्हटले. देवी म्हणून तिची पूजा केली. नदीवर गाणी रचली.

एक दिवस आक्रीत घडले. शतद्रूने पण सरस्वतीचा हात सोडला. शतद्रू सिंधू नदीकडे वळली. सरस्वती आता एकटी पडली. पण पावसाने तिला साथ दिली. नदीला भरपूर पाणी आले. त्यावर शेते पिकू लागली. कितीतरी टुमदार गावं नदीकाठी तेंव्हा वसली. आटपाट नगरे होती. तिथे मोठे रस्ते होते. दुतर्फा घरे होती. रस्त्याने गाड्यांची वर्दळ होती. तिथेले लोकं उद्योगी होते. कापड, मणी, दागिन्यांचा व्यवसाय ते करत होते. सातासमुद्रापार व्यापार चाले. त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली. तिने धन, धान्य, समृद्धी दिली. अश्व आणि गायी दिल्या. गावे ऐश्वर्याने नटली होती.

पुढे पावसाला ओढ लागली. नदीच्या पाण्याला ओहोटी लागली. नदीचे पात्र कोरडे पडले. शेती सगळी करपून गेली. घरदार सोडून लोकं वाट फुटेल तिकडं गेली. सगळी गावे ओस पडली. युग लोटली आणि गावे मातीत गाढली गेली. ही साठा उत्तरांची कहाणी …

… इथे संपत नाही. सरस्वती नदी म्हणून राहिली नाही तरी अंबा म्हणून, देवी म्हणून जागृत राहिली. सरस्वती देवीची आजही पूजा करतात. सरस्वती नदी सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहिली. सरस्वती नदी भूमीत लुप्त झाली, ही कथा हजारो वर्ष लोकांत जिवंत राहिली. गंगा-यमुनेच्या संगमाला गंगा-यमुना-सरस्वतीचा त्रिवेणी संगम मानला गेला.

सरस्वतीचे नदी म्हणून अस्तित्व राहिले नसले तरी तिचे विशाल कोरडे पात्र मागे राहिले. या कोरड्या पात्रातून घग्गर नावाची लहानशी नदी पावसाळ्यात वाहते. ही मौसमी नदी समुद्रापर्यंत पोचत नाही. या कोरड्या पात्राला – भारतात घग्गर, पाकिस्तान मध्ये हाकरा आणि सिंध मध्ये नारा अशी नावे आहेत. १८७४ मध्ये सी. एफ. ओल्डहम नावाचा ब्रिटीश ऑफिसर या घग्गर नदीच्या भागात फिरत होता. १० – १० किलोमीटर रुंदीचे पात्र पाहून त्याला आश्चर्य वाटलं. घग्गर सारखी लहान मौसमी नदी इतके विस्तीर्ण पात्र कसे काय निर्माण करू शकेल, असा प्रश्न त्याला पडला. ही नदी निश्चितच एका प्राचीन मोठ्या नदीचे पात्र वापरत असणार या निष्कर्षावर तो आला. त्यावर Survey of India च्या नकाश्यांचा अभ्यास करून, प्राचीन ग्रंथातील सरस्वतीच्या प्रवासाचा अभ्यास करून तो या निष्कर्षाप्रत पोचला की घग्गर नदी लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या पात्रातून वाहते.

सरस्वती नदीचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथात आला आहे. ऋग्वेदातील सर्वात प्राचीन मंडळातील सूक्त सरस्वती नदीचे भरभरून वर्णन करतात. हिमालयापासून सिंधुसागर पर्यंत वाहते असे तिचे वर्णन येते. दुसऱ्या मंडळात ऋषी सरस्वतीची “सर्वोत्तम माता, सर्वोत्तम नदी, सर्वोत्तम देवी!” अशी स्तुती आहे. ऋग्वेदाच्या शेवटच्या मंडळात मात्र सरस्वतीचा केवळ नामोल्लेख येतो. स्तुती येत नाही. उलट सरस्वती पेक्षा अधिक महत्व सिंधू नदीला दिलेले दिसते.

रामायणात दशरथाच्या मृत्यूच्या वेळी भरत व शत्रुघ्न आजोळी होते. त्यांना अयोध्येतून आलेल्या दूतांकडून निरोप मिळताच ते आजोळहून म्हणजे केकय इथून अयोध्येला परत निघाले. वाल्मिकी रामायण सांगते की या परतीच्या प्रवासात भरताने सतलज, सरस्वती, यमुना, गंगा व गोमती या नद्या पार केल्या. या वर्णानातून सरस्वतीचा प्रवाह यमुना व सतलजच्या मध्ये होता हे कळते. तसेच सतलज नदी त्यावेळी पश्चिमेला वाहत असल्याचे कळते. 

महाभारतात १०० हून अधिक ठिकाणी सरस्वतीचे उल्लेख व माहिती आली आहे. तिच्या प्रवाहात अनेक ठिकाणी तळ्यांची निर्मिती झाली होती. काही ठिकाणी नदीला पुष्कळ पाणी होते. तर काही ठिकाणी ती वाळूच्या खाली अदृश्य झाली होती. विनाशन या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती असा उल्लेख येतो. महाभारतीय युद्धाच्या दरम्यान बलरामाने सरस्वती नदीच्या काठाने तीर्थयात्रा केली. तो सांगतो – उदापना या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती, मात्र भूमीतील ओलाव्याने सरस्वतीचे तेथील अस्तित्व कळत होते. तर आणखी एका ठिकाणी सरस्वतीचे पाण्याने भरलेले मोठे पात्र पाहून आश्चर्यचकित झाल्याचे नमूद केले आहे.

अगदी अलीकडच्या ८ व्या शतकातील चचनामा वा १६ व्या शतकातील बेगलरनामा मध्ये सिंध मधील आता कोरड्या असलेल्या हाकरा-नारा पात्रांतून पाणी वाहत असल्याचे दाखले मिळतात.

ओल्डहमने सरस्वती नदीचे प्राचीन अस्तित्व रेखल्या नंतर जवळ जवळ ५० वर्षांनी, १९२२ मध्ये हरप्पा येथे प्राचीन गावाचे अवशेष मिळाले. लगेचच मोहन-जो-दारो येथे पण एक प्राचीन नागरी सापडली. पुढच्या काही दशकात सिंधू नदीच्या परिसरात अनेक प्राचीन स्थळे उत्खननात मिळाली. या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ किंव ‘हरप्पा संस्कृती’ असे संबोधले जाऊ लागले. आता या संस्कृतीची १,५०० हून अधिक स्थळे मिळाली आहेत. त्या पैकी दोन तृतीयांश स्थळे शुष्क सरस्वतीच्या काठाने आहेत. सिंधू नदीच्या काठाने मात्र ५० पेक्षा कमी स्थळे आहेत. त्यामुळे १९९६ मध्ये, श्री एस. पी. गुप्ता यांनी या संस्कृतीला “सिंधू – सरस्वती संस्कृती” हे नाव योग्य होईल असे म्हटले.

उत्खननाबरोबरच अनेक भूगर्भशास्त्रज्ञांनी, पुरातत्वशास्त्रज्ञांनी ८०च्या दशका पर्यंत Survey of India (SoI) चे नकाशे वापरून सरस्वती नदीचा शोध घेतला. या अभ्यासाला एक कलाटणी मिळाली १९७२ मध्ये. त्यावेळी sattelite मधून काढलेल्या वायव्य भारताच्या छायाचित्रातून स्पष्ट झाले की घग्गरच्या कोरड्या पात्राच्या परिसरातील जमिनीत अधिक ओलावा होता, भूजलपातळी कमी होती आणि या भागात वनराई अधिक होती. ओल्डहम यांनी SoI च्या मदतीने मांडलेला सरस्वतीचा मार्ग या छायाचित्रांनी अधोरेखित केला. या नंतर इस्रोच्या मदतीने Landsat images वापरून या भागाचा अभ्यास केला गेला. ज्या मधून प्राचीन काळातील नद्यांचे मार्ग रेखले गेले.

९० च्या शतकात या भागातील भूजलचा अभ्यास केला गेला. घग्गरच्या कोरड्या पात्रातील भूजलपातळी आजूबाजूच्या परिसरापेक्षा फारच कमी होती. येथून काढलेल्या पाण्याचे BARCने कार्बन डेटिंग केले असता ते ३ ते ४ हजार वर्ष जुने असल्याचे कळले. सरस्वती लुप्त होण्याच्या काळाशी मिळता जुळता हा काळ होता.

२०१३ मध्ये अरबी समुद्रातील मातीचे परीक्षण केले होते. त्यामध्ये ४.५ हजार वर्षांपूर्वी पर्यंत तिथे नदीतून येणारी माती मिळाली. सरस्वती नदी लुप्त होईपर्यंत अरबी समुद्रात त्या ठिकाणी नदी येऊन मिळत होती हे सिद्ध झाले. (Clift and Giosan)

२०१७ पासून केलेल्या अभ्यासात नदी पात्रात जमिनीच्या वेगवेगळ्या पातळीतील silt चे परीक्षण केले गेले. या मध्ये घग्गरच्या पात्रात २५ हजार वर्षांपूर्वी सतलजची माती आढळून आली. याने सतलजचा प्रवाह कधीपर्यंत सरस्वतीला मिळत होता हे निश्चित कळले. (Singh and Sinha (2019))

या बरोबरच प्राचीन हवामानाच्या संशोधनातून जुन्या काळातील पावसाचे प्रमाण कळत आहे. त्यातून मिळणाऱ्या माहिती मधून – नदीतील पाण्याची पातळी, त्याचा नदीकाठच्या गावांवर होणारा परिणाम हे आता कळत आहे. ४ हजार वर्षांपूर्वी अनेक दशकांचा दुष्काळ पडला होता असे कळते. या दुष्काळामुळे नद्यांकाठची गावे ओस पडली.

सरस्वती नदीचा अभ्यास अनेक दृष्टीने महत्वाचा आहे – एक तर यामधून भारताच्या प्राचीन इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी, वेद व  महाभारताचा काळ निश्चितीसाठी ठोस माहिती मिळत आहे. तसे प्राचीन ग्रंथातून दिलेल्या सरस्वती लुप्त झाली सारख्या कथा म्हणजे ‘थोथांड’ आहे असे म्हणता येणार नाही. सिंधू-सरस्वतीच्या खोऱ्यातील गावे का ओस पडली हे कळण्यासाठी मदत होतंय. आर्य आक्रमण सिद्धांत कसा खोटा होता ते कळत आहे. भविष्यात नदीचे प्राचीन पात्र वा पाणी आज उपयोगात आणू शकतो का? अशा कैक गोष्टींची उत्तरे मिळण्यासाठी सरस्वतीचा शोध, व नवनवीन संशोधनातून येणारी माहिती महत्वाची आहे.  

संदर्भ –

  • Identification and mapping of the Saraswati River System: A review and new findings. by Amal Kar; Central Arid Zone Research Institute (CAZRI)

सरस्वती – Satellite Image

 The Saraswati river and the Harappan sites for different time periods.
Source – Chatterjee et al 2019 (Nature Journal)

सरस्वती कालरेखा

Visual Track (उत्खनन, संशोधनाचा) Audio Track (मौखिक परंपरांचा)
महा-सरस्वती७०,००० वर्षांपूर्वी 
यमुना गंगेकडे वळते५० हजार वर्षांपूर्वी 
  ऋग्वेदातील महासरस्वतीचे वर्णन 
सरस्वती ‘लहान’ नदी होते२४ हजार वर्षांपूर्वी 
सतलज सिंधुकडे वळते१५ हजार वर्षांपूर्वी 
 १४ हजार वर्षांपूर्वीरामायण – यमुना व सतलज च्या मध्ये सरस्वतीचा प्रवाह.
 ७.५ हजार वर्षांपूर्वीमहाभारत – ठिकठिकाणी लुप्त झालेल्या सरस्वतीचे वर्णन
सरस्वती वाळून जाते४ हजार वर्षांपूर्वी 
सरस्वती-सिंधू  
  सरस्वती लुप्त झाल्याचा कथा

Table based on research of Nilesh Oak

  • दीपाली पाटवदकर   
Back to top button