मुंबईचे डबेवाले हे मनोमन विठ्ठलभक्त आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार लाभलेले कर्मयोगी आहेत. आषाढी वारीत सहभागी होण्याची तीव्र इच्छा मनात असली, तरी लाखो मुंबईकरांपर्यंत वेळेवर डबे पोहोचवण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी यामुळे त्यांना मनी इच्छा असूनही पंढरपूरच्या वारीला नियमित जाणे शक्य होत नाही. मात्र, विठ्ठलभक्तीची ओढ कायम जिवंत ठेवण्यासाठी ते आषाढी एकादशीच्या निमित्ताने वर्षातील दोन दिवसांची सुट्टी घेऊन पंढरीची वाट धरतात. त्यांच्यासाठी कर्तव्य आणि भक्ती हे वेगळे नाहीत, रोजचे कामही ते विठ्ठलसेवाच मानतात. “कर्तव्य हीच भक्ती” या भावनेने आयुष्य जगणारे मुंबईचे डबेवाले हे विठ्ठलभक्ती, वारकरी संस्कार आणि कर्मयोग यांचा प्रेरणादायी संगम आहेत…