NaxalismNews

नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ८

नक्षलवादी चळवळीला ओहोटी..

नक्षली चळवळीला आता आहोटी लागली की काय, असा सवालही उपस्थित होत आहे. आपली हिंसा वा बंदूक ही अन्यायाविरोधात, शोषणाविरोधात आहे, हे दाखवून देण्यात सुरुवातीच्या काळात नक्षलींना काही प्रमाणात यश आले. त्यामुळे त्यांना जंगलपट्टय़ात सहानुभूती मिळत होती. परंतु, पोलिसांना खबर दिल्याच्या संशयातून गरीब वनवासींना त्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना मिळणार पाठिंबा हळूहळू आक्रसत गेला, असे तज्ञांचे मत आहे. ‘दोन दशकांपूर्वी चळवळीवर जेव्हा विचारसरणीचा प्रभाव होता, तेव्हा कोणालाही शिक्षा देताना दहादा विचार केला जाई. आता मात्र सर्रास यमसदनी पाठवले जाते. दहशत कायम ठेवण्यासाठी नेमाने हत्या घडविल्या जातात,’ असे ज्येष्ठ पत्रकार व नक्षलवाद या विषयाचे अभ्यासक देवेंद्र गावंडे आपल्या पुस्तकात म्हणतात. तेव्हा वैचारिक मतभेद झाले, तरच आत्मसमर्पण करण्याचे धाडस चळवळीतील सदस्य दाखवित. त्यात नैतिक पाठबळ व जनाधार गमावल्याने ही चळवळ आता कठीण परिस्थितीतून जात असल्याची मांडणी करण्यात येत आहे. स्वाभाविकच माओवाद्यांच्या अस्तित्वाची आता कसोटी लागणार, हे नक्की आहे.

विचाराऐवजी हिंसा, दडपशाहीचा मार्ग पत्करल्याने नक्षलवादी चळवळ भरकटत गेली. वनवासींच्या हक्काचा घोष करणारे नक्षलीच वनवासींचे बळी घेत असतील, तर ही चळवळ नेमकी कुणासाठी आहे, असे प्रश्न केले गेले. त्यातूनच या चळवळीचा जनाधार आक्रसू लागला. आज नक्षली चळवळीकरिता नवीन मुले उपलब्ध होत नसून, भरतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी स्थिती दिसते. स्वाभाविकच चळवळ पुढे कशी न्यायची ?

नक्षलवादी चळवळीस आळा घालण्यासाठी दृढ पायावर अधिष्ठित अशा राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. नक्षलवाद्यांवर कारवाई करतांना कोणताही राजकीय हेतू न ठेवता राष्ट्रहितास प्राधान्य दिले पाहिजे. त्याचे राजकीय भांडवल करू नये एवढेच नव्हे तर अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर विविध विरोधी पक्षांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. नक्षलवादी प्रभाव क्षेत्रात जलद गतीने मोठ्या प्रमाणात विकास कामे करून या प्रभावक्षेत्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, त्यामधून लोकशाही सुशासन निर्माण केले पाहिजे, नक्षली प्रभावित भागात अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था निर्माण करून तंत्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण आदिवासी भागात विनामूल्य दिले गेले पाहिजे. या प्रशिक्षित तरुणांना अग्रक्रमाने रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. तरच नक्षली चळवळ नियंत्रणात येऊ शकते…

नक्षलवादी मंडळी म्हणजे नेमके कोण ?

स्वतंत्र भारतात कामगार आणि विद्यार्थी यांच्यातील अस्वस्थता आम्हाला लाल क्रांतीसाठी अनुकूल ठरेल म्हणून लाल माकडांनी येथे पक्ष स्थापन केला मग ते सरकारी जागांवर जाऊन बसले. शिक्षण क्षेत्रात घुसले. काही माकडे थेट काँग्रेसमध्ये जाऊन सत्तेच्या माध्यमातून डावा अजेंडा राबवू लागले आणि जेव्हा लोकशाहीच्या चौकटीत डाळ शिजेना तेव्हा यातील एक गटाने फुटून हिंसक मार्ग स्वीकारला. लोकांच्या दृष्टीने हे जरी दोन गट होते तरी ही धूळफेक होती. आम्ही लोकशाही व्यवस्थेत राहून ती खिळखिळी करतो तुम्ही बाहेरून वनवासी बंधूंना हाताशी धरून युद्ध पुकारा असे ठरलेले धोरण होते. परिणाम एकच साधायचा होता तो म्हणजे लाल क्रांती.

विकासाच्या कुठल्याही योजना यशस्वी होऊ न देणे कुठले ही आरोग्य, शिक्षण, रोजगाराचे प्रश्न सुटणार नाही याची काळजी घेणे. हातात शस्त्र देणे आणि त्यांनाच सैन्या विरुद्ध उभे करणे, पोलिसांच्या विरुद्ध उभे करणे. माणसे मारले गेले की पुन्हा स्थानिक भावना उद्दीप्पीत करत आणखी Recruitment करणे हे त्यांचे धोरण.

याची दुसरी बाजू म्हणजे शहरी स्लीपर सेल उभे करणे. हा शब्द आणि शहरी माओवाद हा शब्द आपण अलीकडे ऐकत असलो तरी हे स्लीपर सेल तयार करण्यासाठी साहित्य आणि चित्रपट हे माध्यम डाव्यांनी वापरली. या दोन्ही माध्यमात डाव्यांनी चांगलाच जम बसवत फिल्म इन्स्टिट्यूट ते NSD पर्यंत ताबा मिळवत शॉर्ट फिल्म, तथाकथित आर्ट फिल्म आणि प्रायोगिक नाटकातून प्रचार सुरू केला.

आक्रोश सिनेमा आठवा. पथेर पंचाली आठवा. असे अनेक ज्यात या लाल माकडांनी कलात्मक साज चढवून एक नकारात्मक छबी भारताची तयार केली. याच सिनेमाना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळायला लागले. त्यांच्या चर्चा. समीक्षणे आणि त्यातुन आज जो शब्द प्रसिद्ध झाला तो इको सिस्टीम यांची विकसित झाली. यातले कुणी प्राध्यापक, कुणी कवी, कुणी नट याना पुरस्कार. हेच सेलिब्रेटी ! या आणि कामगार संघटनांच्या ताकदीवर यांनी आपले पैसे उभे करण्याचे शास्त्र उभे केले आणि यातून लाल क्रांतीचे स्वप्न पुढे नेण्याचे स्वप्न ते पाहत राहिले.

आमच्या राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनात हा माओवादी, लेनिनवादी लाल कॅन्सर कधी बरा होणार ? अजून किती आम्हाला बळी बघावे लागणार ? हा लाल रक्तरंजित आजाराचा इतिहास तुकड्यात बघून चालणार नाही. या रोगाची गाठ वनवासी क्षेत्रात दिसत असेल, रक्त सांडणारी जखम तेथे असली तरी याचे हात पाय शहरात, केरळ ते बंगाल पर्यंत आहेत. या आजाराचा संसर्ग JNU त आहे, जाधवपूर युनिव्हर्सिटीत मध्ये आहे, कोरेगाव भीमा,शाहिनबाग, कृषी आंदोलन, CAA प्रोटेस्ट .. उदाहरणे द्यायची तरी किती ?

वनवासी बंधुनी त्यांना झिडकारण्यास सुरुवात केलीच आहे… आम्ही शहरवासी यांना कधी झिडकारणार ? हा खरा प्रश्न आहे !

समाप्त ..

Back to top button