“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
विठ्ठलभक्तीतून अध्यात्मज्ञानापर्यंत पोहोचलेल्या संत बहिणाबाई
वारकरी संत परंपरेत आपल्या गुरुभक्तीमुळे आणि अमोघ काव्यप्रतिभेमुळे संत बहिणाबाई विशेष प्रसिद्ध आहेत. अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या आदी मिळून सातशेहून अधिक रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. बहिणाबाईंचे लेखन भक्तिभावाचा उत्स्फूर्त आविष्कार असून त्यात वेदांताचा गहन विचारही आढळतो.
संतकृपा झाली, इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया ॥
नामा तयाचा किंकर, तेणे रचिले आवार ।
जनार्दन-एकनाथ, खांब दिला भागवत ॥
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश ।
बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा ॥
संत तुकाराम महाराजांविषयी बहिणाबाईंची अढळ श्रद्धा आणि गुरुनिष्ठा होती. तुकोबारायांनी त्यांना दृष्टांत देऊन गुरुपदेश केल्याची परंपरा सांगितली जाते. त्या गुरुबोधामुळे बहिणाबाईंच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्यांच्या अनेक अभंगांत संत तुकाराम महाराजांचे चरित्र, उपदेश आणि भक्तिमार्गाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ॥
तुका घेतो कडियेवरी । नामा करांगुळी धरी ॥
एकनाथ खांद्यावरी । कबीराचे हाती धरी ॥
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ॥
बहिणाबाईंनी आपल्या अभंगांतून गुरुपरंपरा, आत्मनिवेदन, भक्ती, वैराग्य, अध्यात्म आणि जीवनमूल्ये अशा विविध विषयांवर चिंतन मांडले आहे. त्यांच्या प्रासादिक, साध्या आणि सहज भाषेतील अभंगरचना आजही समाजाला भक्ती, सदाचार आणि अध्यात्माची प्रेरणा देत आहेत…
