News

भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. ११ नोव्हेंबर- अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढ़ा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सोशल मीडिया आणि आयटी सेल टीमच्या प्रतिनिधी मंडळाने मंगळवार १० नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आज सर्वसामान्य नागरिक आणि प्रसारमाध्यमांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने घाबरवले जात आहे व कारवाईही करण्यात येत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात असे ५६ खटले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार, सोशल मीडियावर लिहिणारे आणि युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांचा समावेश आहे, असे राजभवनात झालेल्या या भेटीदरम्यान मंगलप्रभात लोढा राज्यपालांना म्हणाले  

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व मुंबई भाजपचे(BJP)अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली खासदार गोपाल शेट्टी, आमदार आशीष शेलार, आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार पराग अळवणी, आमदार मनिषा चौधरी, आमदार भारती लव्हेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार सुनिल राणे यांच्यासह भाजपाच्या आमदार यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता.

सोशल मिडियाच्या(MEDIA) माध्यमातून आपली मते व्यक्त करणा-या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येत आहे, तसेच समाजामधील जर कोणीही व्यक्ती सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असेल तर त्यांनाही पोलिस स्टेशनला बोलवून त्यांच्यावर गु्न्हा दाखल करणे असे प्रकार सध्या सुरु आहेत. हे प्रकार म्हणजे राज्याला अराजकतेकडे जाणारे चित्र ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत निर्माण झाल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले. 

सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होणारे अभिव्यक्ति स्वातंत्र्य तसेच प्रसार माध्यमांची स्वातंत्र्यता याबाबत सरकारचा एकतर्फी जुलूमी कारभार सुरु आहे. त्यामुळे यासंदर्भात अंकुश आणण्यासाठी निवृत्त न्यायाधीश, मुख्य सचिव आणि सोशल मीडियामधील तज्ज्ञ सदस्यांची एक समिती नियुक्त करावी. या समितीचा अहवाल मागून राज्यपालांनी या विषयात स्वत: हस्तक्षेप करुन या गोष्टी थांबवाव्यात अशी आमची भूमिका आम्ही राज्यपाल महोदयांकडे मांडली असेही दरेकर यांनी सांगितले.

**

Back to top button