“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
पांडुरंगाचे अनन्य भक्त संत चोखामेळा…
‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते उपेक्षितांची कैफियत तळमळीने पांडुरंगाकडे मांडणारे संत चोखामेळा..
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतानासुद्धा अखंड नामस्मरण करत. दैन्य, दारिद्रय, वैफल्यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष विठ्ठलाने त्यांना जवळ केले. त्यांना विपुल संतसंग लाभला. संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले.
संस्कारसंपन्न, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. उपेक्षितांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, सकल समाज एकसंध व्हावा यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे अविरत प्रयत्न केले.
‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।।’
