“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
संत ज्ञानेश्वर महाराज..
“आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ।।
हरी पाहिला रे, हरी पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ।।”
अर्थात : ईश्वराची अनुभूती झाल्यावर भक्ताचे जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाते. तो दिवस भक्तासाठी परमोच्च आनंदाचा असतो. भक्तीमुळे अंतर्मन शुद्ध होते आणि सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व अनुभवता येते. त्यामुळे सर्वांनी सर्वात्मभाव, समता आणि भक्तीचा स्वीकार करावा.
संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे महान तत्त्वज्ञ होते. त्यांनी आपल्या वाङ्मयातून आणि आचरणातून जगाला समरसतेची, पर्यायाने एकात्मतेची शिकवण दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांची समरसतेची शिकवण ही केवळ तेराव्या शतकापुरती मर्यादित नसून ती आजच्या आधुनिक काळातही अत्यंत गरजेची आहे. आज समाजात असलेले वाद, द्वेष आणि भेद दूर करण्यासाठी माऊलींचा “मैत्र जीवांचे” हा संदेश मार्गदर्शक ठरतो. सर्व मानवांमध्ये एकच चैतन्य विराजमान आहे.
“या रे या रे लहान थोर । याती भलती नारी नर ।
करिती अलोट गजर । विठ्ठल नामे ।।”
